"बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धिक चरित्रे बरीच आहेत; पण आजवर त्यांचे व्यक्तिमत्व चित्रित करणारे चरित्र लिहिले गेलेले नाही. बाबासाहेबांनी काय विचार केला, काय लिहिले हे या चरित्रांमधून आपल्याला वाचायला मिळते; पण बाबासाहेब कोण होते, त्यांचे आंतरिक संघर्ष काय होते, त्यांच्या संवेदना काय होत्या यावर ही चरित्रे फारसा प्रकाश टाकत नाहीत. ती आंबेडकरांची माहिती देतात; पण त्यांच्या आंतरिक आयुष्याबद्दल आणि आधुनिक भारताच्या संवैधानिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवणारा एक मनुष्य म्हणून आंबेडकरांची व्यक्ती म्हणून कशी वाढ होत गेली याबद्दल ही चरित्रे बोलत नाहीत.
आंबेडकरांच्या महत्त्वाकांक्षी द्विखंडात्मक चरित्रग्रंथापैकी 'बाबासाहेब घडताना' हा पहिला खंड बाबासाहेबांचा जन्म (१८९१) ते परिवर्तनकारी महाड सत्याग्रह (१९२७) हा जीवनप्रवास उलगडतो. आंबेडकरांच्या जीवनानुभवांकडे हा खंड नव्याने पाहतो आणि 'बाबासाहेब आंबेडकर' या आख्यायिकेमागील माणसाचा स्वभाव आणि चरित्र वाचकांसमोर मांडतो. एक अतिशय विस्तृत, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित झालेले हे कथन आहे. ते आंबेडकरांचे चरित्र तर सांगतेच; पण त्यांच्या समकालीन वारशाची काही वैशिष्ट्येही सांगते. ही एका लक्षणीय दृढ निश्चयाची कथा आहे आणि त्यातील समृद्ध अशा जीवनशक्तीसह ती सांगितली गेली आहे.
आंबेडकरांची पुस्तके आणि भाषणे सार्वजनिक अवकाशात उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्वत्तापूर्ण ग्रंथांमध्ये त्यांच्या लिखाणाचे आकलन आणि त्यांच्या विचारांची मांडणी कायमच होत राहील. दरम्यान, जुनी मिथके आणि आंबेडकरांच्या विचारांबद्दलच्या, जीवनातील घटनांबद्दलच्या - अगदी त्यांच्या नातेसंबंधांबाबतच्या - चुकीच्या 'वस्तुस्थिती'देखील कायम राहतील. ऐतिहासिक नोंदी योग्य असाव्यात यासाठी 'बाबासाहेब घडताना' हा ग्रंथ मूळ संग्रहणाचे संशोधन करून लिहिला आहे. आपल्या जीवनकालातील बाबासाहेबांचे उठावदार चित्रण करणाऱ्या या चरित्रग्रंथाचे दोन्ही खंड वाचकांसमोर एक नवे बाबासाहेब - खरे बाबासाहेब - उभे करतील.
"
Author: Akash Singh Rathore | Publisher: Mehta publishing house | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 272