भारत हा जगातील एकमेव देश असेल ज्याची खरी ओळख पुसून टाकण्यासाठी एक राष्ट्र म्हणून त्याचं अस्तित्वच नाकारण्यात आलं. शिक्षण आणि इतिहास या त्याच्या शक्तिस्थानांवर हल्ला करून त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट करण्यात आला. कधीच लयाला गेलेल्या आणि संग्रहालयापुरत्या उरलेल्या इतर प्राचीन संस्कृतीचं वारेमाप गुणवर्णन करण्यात साम्राज्यवादी शक्तींना कुठलीही अडचण वाटली नाही. पण हजारो वर्षांपासून आजही जिवंत असलेल्या भारतीय संस्कृतीचं महत्व मान्य करणं निरंकुशतावादी शक्तींसाठी गैरसोयीचं होतं. राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी या शक्तींनी लादलेल्या वसाहतवादी मानसिकतेतून भारतीयांची अजूनही पूर्णपणे मुक्तता झालेली नाही. न्यूनगंड, आत्मनिंदा यांचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. कारण भारतीयांना आपली खरी ओळख अजूनही गवसलेली नाही. 'सभ्यता' या शब्दाचा अर्थ जगाला समजावणारा ; भाषा आणि संस्कृतीची देणगी जगाला देणारा ; विविध ज्ञानशाखांची पायाभरणी करणारा ; गळेकापू स्पर्धेशिवायही समृद्धीची निर्मिती करता येते हे दाखवून देणारा ; वैश्विक मानवी मूल्यांचा संदेश देणारा ; अराजक, अस्थैर्य, असहायता यांच्या गर्तेत सापडलेल्या जगाला स्थैर्य, शांती, समृद्धी, सर्वसमावेशकता यांचा मार्ग दाखविण्याची क्षमता असलेला देश, ही भारताची खरी ओळख भारतीयांनाच करून देणे अत्यावश्यक आहे. वसाहतवादी मानसिकता झुगारून दिलेला, आपली खरी ओळख पटलेला, आपल्या सुप्त क्षमतांची जाणीव झालेला भारतच जगाला मार्ग दाखविण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सिद्ध होऊ शकेल.
Author: Abhijit Jog | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 336