माझ्या मनात एक प्रश्न सातत्याने घोंगावतोय, मेहतर समाजाचे आदिपुरुष असलेल्या वाल्मीकी ऋषींच्या हातात, एकेकाळी जर ‘रामायण’ शब्दबद्ध करणारी लेखणी होती. तर मग त्यांचा वारसा जपणाऱ्या या समाजाच्या एका हातात अजूनही झाडू आणि दुसऱ्या हातात कचऱ्याची टोपली का दिसतेय? शेवटी, संघाच्या अपप्रचारासमोर कोण टिकू शकते, म्हणा. या घडीला दलित समाजातल्या तमाम जातींच्या कानांमध्ये हेच भरवले जातेय की, परकीयांनी आक्रमण करण्याआधी भारतात जातव्यवस्था तर होती; परंतु जाती-जातींमध्ये भेदभाव नव्हता. त्यामुळे तुमच्या या अवस्थेला मुघल, यवन, पठाण यांसारखे मुस्लीम समुदाय जबाबदार आहेत. ही गलिच्छ कृत्ये आहेत, त्याला सर्वथा मुस्लीम शासकच जबाबदार आहेत. मुख्यतः त्यांच्याचमुळे समाजातले दलितांचे स्थान डागाळलेले राहिले आहे….
मग, याचा एकच अर्थ आहे. तो म्हणजे, हिंदू समाजातली वर्णव्यवस्था, जातभेद, उच्च जातींनी गेल्या पाच हजार वर्षांपासून तळागाळातल्या जातसमुदायांचे केलेले शोषण, माणसाला गुलाम बनवणारी मनुवादी, ब्राह्मणवादी अमानुष व्यवस्था या साऱ्यांचा दोष वर्णवादी हिंदूंचा जरासुद्धा नाहीये. सगळ्या दलितांना हे सांगितले गेले आहे की, त्यांचे पूर्वज शूर योद्धा होते, जीवाची बाजी लावून ते सतत लढत राहिले, परंतु जेव्हा ते हरले, तेव्हा क्रूर मनोवृत्तीच्या मुघलांनी आणि यवनांनी त्यांना गुलाम बनविले.
संघाच्या अपप्रचारानुसार दलित जातींवर झालेल्या अन्याय-अत्याचाराचे खरे सूत्रधार जातपात मानणारे सवर्ण हिंदू नव्हे, तर धर्मांध मुस्लीम हेच आहेत. इथे चलाखी बघा, संघाने स्वतःला बिनबोभाटपणे निर्दोषत्व जाहीर करून टाकले आहे आणि स्वतःची जबाबदारी झटकून दुसऱ्याच कुणाला दोषी ठरवून टाकले आहे. याहून मोठा धूर्तपणा, ढोंगीपणा दुसरा काय असू शकतो ? पण शेवटी यावर कोण काय करू शकते म्हणा. १९२५ मध्ये बीजारोपण झालेली विषवल्ली आता चांगलीच फोफावली आहे. आजही दलितांच्या इतिहासाची विकृत मांडणी केली जात आहे…
Author: Bhanwar Meghwanshi | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 224