लहानपणापासूनच आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला, पोरका मिलिंद प्रेमाच्या, मनःशांतीच्या ओलाव्याचा शोध घेत प्रवासी म्हणून निसर्गाच्या अंगा-खांद्यावर भटकत जंगलानं वेढलेल्या राधेकृष्ण मंदिराच्या आसऱ्याला क्षणिक विसाव्यासाठी येतो. तिथं त्याला ऋषितुल्य बाबा, त्यांच्या मुलीसारखी असणारी, त्यांच्यासोबत राहून मंदिरात सेवा देणारी नंदिनी व तिचा ७-८ वर्षांचा मुलगा भेटतात. विसाव्याच्या काही क्षणांसाठी आलेला मिलिंद या तिघांच्या सहवासात चार-सहा दिवस घालवतो. नंदिनीही आपल्या आयुष्यात जवळच्या माणसांना पारखी झालेली असते. आपल्या मुलाची जबाबदारी तिच्यावर असते. बाबांच्या प्रेमळ संरक्षक कवचात ती क्वचित येणाऱ्या वाटसरूंचीही बाबांबरोबर सेवा करत असते. तिच्या सात्त्विक, सुंदर व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण मिलिंदला भुरळ पाडतं. तशात बाबा परिसरातील गावकऱ्यावर निसर्गातील जडीबुटींचे वैद्यकीय उपचार करण्यासाठी मदत करत असल्यानं, २-३ दिवस मिलिंदकडे नंदिनी-राहुलला सोपवून जातात; पण आधीच दुःखानं पोळलेली नंदिनी त्याला प्रतिसाद देण्यास घाबरते. पुन्हा एकदा वैवाहिक आयुष्याचा डाव मांडावा की नाही, याबद्दल तिची द्विधा अवस्था होते. अखेर मिलिंद तिची मनोवस्था जाणून, आपल्या पुढच्या वाटचालीकरता एकटाच निघण्याची तयारी करतो. ...पण बाबा येईपर्यंत त्याला थांबावे लागते. काय होते बाबा परत आल्यावर? बाबा त्या दोघांच्या मनाची उलघाल ओळखतात आणि सांगतात- ‘‘परिचय अल्प आणि दीर्घ नसतोच मुळी! दोन मनांची पुरी ओळख जिथं होते, तिथं मी एकमेकांकडे आकर्षिली जातातच मुळी! ही शक्ती अफाट सामर्थ्यदायी आहे. नदी सागराला मिळते, ती कोणत्या परिचयानं? वीस वर्षांपूर्वी मी इथं फिरत फिरत आलो. या मूर्तीपेक्षा अनेक सुंदर मूर्ती, अनेक सुंदर जागा मी पाहिल्या; पण तिथं माझं मन रमलं नाही. ही मूर्ती पाहिली आणि मी जिंकलो गेलो. हे का घडलं?`` अखेर बाबांच्या आशीर्वादानं दोघांची एकत्र वाटचाल सुरू होते.
Author: Ranjeet Desai | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 104