सुरत हे मुघल साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वतः मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता. इंग्रज वखारीचा प्रेसिडेंट ऑक्झिडेंन १९ मार्च १६६४ च्या पत्रात म्हणतो,
"त्याचा (शिवाजी महाराजांचा) उद्देश केवळ संपत्ती मिळविणे नसून बादशाहावर सूड उगविणे हा होता."
१६६४ पर्यंतच्या महाराजांच्या मुघल बादशाही विरुद्धच्या हालचाली काही अपवाद वगळता बचावात्मक स्वरूपाच्या होत्या. पण सुरतेवरील हल्ला हा मात्र मुघल बादशहाला दिलेले उघड आव्हान होते. खंडप्राय पसरलेल्या आणि अनेक पिढ्यापासून खोलवर रुजलेल्या आशिया खंडातल्या सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या व श्रीमंत लष्करी ताकदीला आव्हान देणं सोपं कधीच नव्हतं. मराठे आणि मुघल यांच्यातलं सैनिकी संख्याबळ कागदोपत्री प्रतिकूल दिसत असतानाही सुरत लूटीचं दिव्य महाराजांनी एक नाही दोन वेळा घडवून दाखवलं, तेही अचूक लष्करी आखणीत. लष्करी डावपेच आणि राजकीय मुत्सद्दीपणा अश्या दोन्ही आघाड्यांवर महाराजांनी औरंगजेबाला दिलेला हा जबरदस्त शह होता. सुरत लूट मुघल साम्राज्याची अर्थव्यवस्था मुळापासून हादरवणारी ठरली.
Author: Girish Takale | Publisher: Marathidesha Foundation | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 128