"...टारफुला एका खेड्यातील परिवर्तनाचे चक्र चित्रित करते. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देते. एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे. हे खरे तर १९६४ च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नैतिक तपशील ह्या कादंबरीत आहेत. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकर्ण्याला हे विघटित समाजजीवन सांभाळता येत नाही, हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते १९६४ साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवरा-बायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशैलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपर्यंतचे चिरेबंद रूप मांडते..." - भालचंद्र नेमाडे
Author: Shankar Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 288